इंधन पुरवठा सुरळीत करण्याची हरि आण्णा जाधव यांची प्रशासनाकडे मागणी
बागलाण प्रतिनिधी
बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले असून, मान्सूनपूर्व शेतीकामे ठप्प झाली आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. डिझेलअभावी ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्रे तसेच विहिरींचे पंपसेट बंद पडले असून मशागतीची कामे खोळंबली आहेत. वेळेत शेतीची तयारी पूर्ण होईल का, अशी चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कांदा सडण्याची भीती
उन्हाळी कांद्याची काढणी झाल्यानंतर बाजारात माल पोहोचवण्यासाठी वाहतुकीची गरज असते. मात्र ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा चाळीतच पडून आहे. परिणामी कांदा सडण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
डिझेलसाठी शेतकरी एका गावातून दुसऱ्या गावात भटकंती करत असून, अनेक ठिकाणी तासन्तास प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याची परिस्थिती आहे. मर्यादित इंधन वितरणामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूकही प्रभावित झाली असून ग्रामीण अर्थचक्राला मोठा फटका बसत आहे.
“शासनाने तातडीने दिलासा द्यावा”
या संदर्भात Hari Anna Jadhav यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मार्च महिन्यातील पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आधीच संकटात आहेत. आता डिझेलअभावी मशागतीची कामे बंद पडल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करावा, संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी आणि कांद्याची नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी.”
प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आगामी खरीप आणि रब्बी हंगामावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






