प्रतिनिधी, अमळनेर :
डिजिटल इंडियाच्या युगातही पाटोदा तालुक्यातील अमळनेर गाव आजही 5G इंटरनेट सुविधेपासून पूर्णपणे वंचित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशभरात 5G सेवा सुरू होऊन तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला असतानाही अमळनेर आणि परिसरातील नागरिकांना अजूनही 2G-3G स्पीडवरच काम करावे लागत आहे.
निकृष्ट इंटरनेट सेवेचा फटका विद्यार्थ्यांपासून शेतकरी, व्यावसायिक आणि ऑनलाइन काम करणाऱ्या तरुणांपर्यंत सर्वांनाच बसत आहे. ऑनलाइन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे क्लास वारंवार बंद पडत असून, बँकिंग सेवा, ऑनलाइन सरकारी कामे आणि वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक निरंजन संदीप मिसाळ यांनी सांगितले की, “5G सुविधा मिळेल या अपेक्षेने महागडे 5G स्मार्टफोन घेतले, मात्र गावात नेटवर्कच उपलब्ध नसल्याने रिचार्जचा खर्च वाया जात आहे.”
ग्रामस्थांनी संबंधित टेलिकॉम कंपन्यांनी अमळनेर परिसरात तातडीने 5G सेवा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करून आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.









