सुपीक जमीन संपादनास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हजारो शेतकरी आज उपविभागीय कार्यालयावर धडकणार
सारथी महाराष्ट्राचा | दिनांक : २६/०५/२०२६
गोंडपिपरी :
गोंडपिपरी तालुक्यातील वढोली, करंजी, चेक पेल्लूर, वडकुली, चेक वडकुली, सिरसी देऊळवार, चेकबेरडी, बोरगाव, धानापूर, चेक बोरगाव, लिखितवाडा आणि खरारपेठ बारा गावांमध्ये प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शासनाकडून जमीन अधिग्रहणासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या असून शेतकऱ्यांना व्यक्तिगत नोटिसा देण्यास सुरुवात झाली आहे.
“शेती आमची, निर्णय आमचा – मोबदला नको, शेतीही देणार नाही” अशी ठाम भूमिका घेत औद्योगिक कृती संघर्ष समितीच्या पुढाकारातून बुधवार दि. २६ रोजी हजारो शेतकरी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. पंचायत समितीपासून उपविभागीय कार्यालयापर्यंत हा पायदळ मोर्चा निघणार असून एमआयडीसीची मान्यता तात्काळ रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जाणार आहे.
प्रस्तावित एमआयडीसीमुळे परिसरातील हजारो एकर बागायती व सिंचनाखालील सुपीक जमीन नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेती हाच येथील शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांचा प्रमुख उदरनिर्वाहाचा आधार असल्याने जमीन संपादन झाल्यास संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
तसेच या प्रकल्पामुळे शेकडो कुटुंबांवर विस्थापनाचे संकट ओढवेल व बेरोजगारी वाढेल, असा आरोपही करण्यात आला आहे. “सुपीक जमीन उद्योगासाठी नव्हे, तर शेतीसाठीच राहू द्या,” अशी आर्त हाक आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.
मोर्चादरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार असून, एमआयडीसीची अधिसूचना मागे घेऊन प्रकल्पाची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती औद्योगिक कृती संघर्ष समितीकडून देण्यात आली आहे.










