महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलीम सय्यद यांचे पोलिस प्रशासनाला पत्र
पुणे प्रतिनिधी
शिरूर :
शिरूर शहरातील महिला, विद्यार्थिनी आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात विशेष “दामिनी पथक” कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तथा नगरसेविका आयेशा कलीम सय्यद यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केजेंळे यांना सविस्तर पत्र देत महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
दि. १४ जून २०२६ पासून शाळा व महाविद्यालये सुरू होत असल्याने शहरातील विविध शाळा, महाविद्यालय परिसर, बसस्थानके, मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
सध्या सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण होत असून काही ठिकाणी छेडछाड, गैरवर्तन तसेच महिलांना असुरक्षित वाटत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे शिरूर शहरात स्वतंत्र “दामिनी पथक” सुरू करून शाळा, महाविद्यालय परिसर, बसस्थानक, बाजारपेठ तसेच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी नियमित गस्त घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे पथक कार्यान्वित झाल्यास महिलांना व विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होईल. तसेच महिलांवरील गैरप्रकारांना प्रतिबंध होऊन नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वासही आयेशा सय्यद यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम १९६५ अंतर्गत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे शिरूर शहराच्या दृष्टीने महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत “दामिनी पथक” तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
या पत्राची प्रत पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच वाहतूक शाखेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही देण्यात आली असून, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर तातडीने सकारात्मक कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.











