आजरा : प्रतिनिधी
सुळेरान पैकी घाटकरवाडी येथील ‘गावडे घरकुल’ आणि त्यांच्या आप्तेष्टांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘गंगा चंद्र साहित्य कला सेवा मंच’चा काव्य पुरस्कार २०२६ सोहळा आजरा येथील चैतन्य सांस्कृतिक सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विशेष म्हणजे पती-पत्नीच्या लग्नाचा ६२ वा वाढदिवस एका आगळ्यावेगळ्या साहित्यिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मा. जयवंतराव शिंपी होते, तर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक मा. सलीम मुल्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सौ. जिजाबाई आणि श्री. हरी चंद्रू पाटील यांच्या ६२ व्या लग्नदिनानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, पुस्तक पूजन, वृक्ष पूजन आणि औक्षणाने झाली. त्यानंतर पाटील दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना ‘गंगा चंद्र’चे अध्यक्ष तथा रेंज फॉरेस्ट ऑफिसर दत्ता पाटील यांनी केली.
यावेळी लहान मुलांच्या काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान
कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
- साहित्यव्रती पुरस्कार : श्री. सुभाष शंकर विभुते (आजरा)
- शिक्षणव्रती पुरस्कार : सौ. जयश्री निवृत्ती अडकूरकर (घाटकरवाडी)
- ज्ञानव्रती पुरस्कार : कु. संजीवनी निवृत्ती खोत (ठाणे)
‘काव्य पुरस्कार २०२६’ वितरण
सन २०२६ चे मानाचे काव्य पुरस्कार खालील साहित्यिकांना प्रदान करण्यात आले :
- श्रीहरी काव्य पुरस्कार — उषा भोसले (लातूर)
काव्यसंग्रह : ‘अंकुर’ - जिजाई काव्य पुरस्कार — कल्पना मलये (कणकवली)
काव्यसंग्रह : ‘समज उमज’ - सुवर्णसाक्षी पुरस्कार — प्रदीप बडदे (नवी मुंबई)
काव्यसंग्रह : ‘माणुसकीची अंत्ययात्रा’
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्व विजेत्यांनी या कौटुंबिक आणि साहित्यिक वातावरण लाभलेल्या अनोख्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
मान्यवरांचे मार्गदर्शन
८७ वर्षीय श्रीहरी पाटील यांनी कला, लोककला आणि संस्कार यांवर प्रभावी मार्गदर्शन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रमुख पाहुणे सलीम मुल्ला यांनी ‘निसर्ग आणि नातेसंबंध’ या विषयावर भाष्य करत साहित्य आणि संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात जयवंतराव शिंपी यांनी एकत्रित कुटुंब पद्धती, नातेसंबंध आणि साहित्य चळवळीची आजच्या काळातील गरज स्पष्ट केली.
‘घाटकरवाडी पॅटर्न’चे कौतुक
आई-वडिलांच्या लग्नदिनानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी असा भव्य साहित्यिक सोहळा आयोजित करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा ‘घाटकरवाडी पॅटर्न’ उपस्थितांनी समाजासाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गंगा चंद्रच्या सचिव सौ. वैष्णवी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विवेक, अनामिका, मयूर, गंधर्व, पूजा, अक्षय आणि सागर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी गावडे घरकुल, घाटकरवाडीतील नागरिक, आप्तेष्ट आणि साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











