“केवळ सत्कार नको तर पुढील मार्गदर्शनाचीही गरज” – शहानवाज मुल्ला
आजरा (प्रतिनिधी):
आजऱ्यातील नामांकित जवाहर नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार समारंभ नुकताच संस्थेच्या सिलेमानशेठ दिडबाग हॉल येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन इकबाल शेख होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक बशीर काकतिकर यांनी केले, तर प्रास्ताविक समीर चांद (सर) यांनी केले.
या सत्कार समारंभात उर्दू हायस्कूल, पंडित दीनदयाळ विद्यालय, व्यंकटराव हायस्कूल, रोझरी हायस्कूल आणि अण्णाभाऊ विद्यालयातील दहावी परीक्षेत प्रथम पाच क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
तसेच, महंमदसमी रिजवान पटेल याने पोलीस भरतीत यश मिळवल्याबद्दल आणि बिलाल लतीफ यांची शिवसेना (उबाठा) कामगार सेना शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
प्राथमिक शिक्षक शहानवाज मुल्ला यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना सांगितले की,
“अशा प्रकारचे सत्कार समारंभ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. मागील पिढ्यांना शिक्षणाच्या संधी कमी मिळाल्या, मात्र आजच्या पिढीला योग्य दिशा आणि प्रेरणा दिल्यास ती विविध क्षेत्रांत नक्कीच चमकेल.”
ते पुढे म्हणाले,
“केवळ सत्कार करून थांबून चालणार नाही, तर गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, करिअर आणि स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. त्यांना अकॅडमी व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या, तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठे यश मिळवू शकतील.”
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास रुकसाना नसरदी, शबनम मुल्ला, इलियास तकीलदार, असलम लमतुरे, असिफ सोनेखान (नगरसेवक), तौफिक आगा, असिफ दरवाजकर, बशीर इंचनाळकर, गणी मुल्ला, इकबाल दरवाजकर, अब्दुलरशीद खेडेकर, बशीर मुजावर, अब्दुलरशीद पठाण, इसाक नेसरीकर यांच्यासह संस्थेचे सभासद, हितचिंतक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इस्माईल बेपारी (सर) यांनी केले.











