कारंजा बायपास | तालुका प्रतिनिधी जी.के. सारथी महाराष्ट्रचा
कारंजा बायपास परिसरात पुन्हा एकदा चोरीची धक्कादायक घटना घडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारच्या सुमारास बायपास येथील गुप्ता सुपर शॉपी समोर उभ्या असलेल्या ऑटो ॲपेमधील वाहनाची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दिवसाढवळ्या होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पातुर नंदापूर येथील एका शेतकऱ्याने आपली बैलजोडी विक्री करून मिळालेली ७५ हजार रुपयांची रोकड सोबत घेतली होती. काही कामानिमित्त तो कारंजा बायपास परिसरात आला होता. दरम्यान, गुप्ता सुपर शॉपी समोर वाहन उभे करून तो काही वेळासाठी बाहेर गेला असता, संधी साधून अज्ञात चोरट्यांनी वाहनाची काच फोडली आणि आत ठेवलेली रोकड घेऊन पसार झाले.
घटना लक्षात येताच शेतकऱ्याने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, कारंजा बायपास परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, व्यापाऱ्यांनी व वाहनधारकांनी पोलिस प्रशासनाकडे वाढीव सुरक्षा व्यवस्था, नियमित गस्त आणि संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, बैलजोडी विकून आणलेली मेहनतीची रक्कम चोरीला गेल्याने संबंधित शेतकरी हतबल झाला असून, “कष्टाने कमावलेले पैसे क्षणात गेले” अशी व्यथा त्याने व्यक्त केली. या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्येही संतापाची लाट पसरली आहे.








