किल्ले मच्छिंद्रगड प्रतिनिधी
श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, यावर्षी मंगळवार दि. १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता किल्ले मच्छिंद्रगड येथून पंढरपूर आषाढी वारीसाठी पायी दिंडी सोहळ्याला भव्य प्रारंभ होणार असल्याची माहिती जगद्गुरु मच्छिंद्रनाथ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. श्री तुकाराम महाराज मटकरी यांनी दिली.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. मल्हारी महाराज जवारी, विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष श्री प*** चव्हाण, सचिव सुभाष मोरे, खजिनदार तानाजी यादव तसेच दिंडी सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. वारकऱ्यांच्या निवास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, भोजन व्यवस्था, सुरक्षा तसेच मार्गावरील विविध सोयी-सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक व वारकरी सहभागी होणार असल्याने सर्व तयारी काटेकोरपणे करण्यात येत असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.
ह.भ.प. तुकाराम महाराज मटकरी यांनी बोलताना सांगितले की, “श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा भक्ती, परंपरा आणि वारकरी संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व गावांच्या दिंड्या व दिंडी प्रमुखांनी आवश्यक नोंद घेऊन आपापल्या तयारीला सुरुवात करावी.”
तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनी शिस्त, स्वच्छता आणि भक्तिभाव जपत सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले.
दरम्यान, पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, वारकरी व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.











