तिलारी प्रतिनिधी, दिनांक 27 मे.
साटेली-भेडशी परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून, रस्ते कामातील हलगर्जीपणामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. आवाडे येथे तिलारीच्या दिशेने जाणारी एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोदकामाजवळ घसरून अडकली. रस्ते कंत्राटदाराच्या बेजबाबदार कामकाजामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
याच परिसरात साटेली-भेडशी खालचा बाजार येथे थोड्याच वेळापूर्वी आणखी एक कार घसरल्याची घटना घडली. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही वाहने बाहेर काढण्यात आली.
दरम्यान, काल वायंगणतड येथेही एक ट्रक रस्त्याच्या बाजूच्या खड्यात रुतल्याची घटना घडली होती. सलग घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील धोकादायक परिस्थिती सुधारावी, अशी मागणी होत आहे.











