जळकोट | सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील पाटोदा बु. येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर बालाजी अधुरे यांनी चारधाम यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण करून सुखरूप गावी परतल्यानंतर आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करून गावासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
चारधाम यात्रेनंतर बालाजी अधुरे यांनी गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी ओबर्स व पोळीचा पारंपरिक आस्वाद भाविकांना देण्यात आला. मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. “यात्रा करून परतल्यानंतर समाजासाठी काहीतरी करावे” या भावनेतून त्यांनी हा उपक्रम राबविल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, जळकोट नगरपंचायत अध्यक्षा सौ. प्रभावती चंद्रकांत काबळे यांच्या मुलाच्या मंगल विवाह सोहळ्याचाही शहरात मोठ्या उत्साहात समारंभ पार पडला. आयुष व प्रतीक्षा यांचा विवाह सोमवार दि. २५ मे रोजी दुपारी १२:३० वाजता संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार मा. संजय भाऊ बनसोडे साहेब, मा. बाबासाहेब जाधव साहेब, जळकोट उपनगराध्यक्ष मा. मन्मथ आप्पा किडे साहेब, डॉ. कलवले संजय नागनाथ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. विवाह सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
याचदरम्यान जळकोट शहरात अवकाळी पावसाने व जोरदार वाऱ्याने हजेरी लावली. शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात वारा व पाऊस पडल्याने काही ठिकाणी झाडे कोसळली तर अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. पत्रे सावरण्यासाठी व नुकसान टाळण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र शहरात दिसून आले.
सुदैवाने या नैसर्गिक आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











