शहादा,दि.२७ (प्रतिनिधी)
येथील गांधीनगर भागात अधिक मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला उत्साहात सुरुवात झाली आहे. या सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असल्याने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
सप्ताहात दररोज रात्री ८ ते ११ वाजेदरम्यान मध्य प्रदेशातील कंचनखेडी (रतलाम) येथील सुप्रसिद्ध भागवत कथाकार आचार्य अनिल शर्मा महाराज हे आपल्या रसाळ वाणीतून कथेचे निरुपण करत आहेत.कथेदरम्यान मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले की,
माता-पिता हे जगात सर्वश्रेष्ठ असून त्यांची सेवा केल्यास परमेश्वर प्राप्ती नक्कीच होते. जीव मायात बांधला जातो तर ब्रह्मात जीव मुक्त होतो त्यामुळे प्रत्येकाने परमेश्वराशी जुळणे महत्त्वाचे आहे.”यावेळी त्यांनी सामाजिक संदेश देत तरुणांना दारू, बिडी, सिगारेट, तंबाखू यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने घराजवळ झाडे लावावीत, मुक्या प्राण्यांना मदत करावी आणि पक्ष्यांसाठी छतावर पाणी व अन्नाची व्यवस्था करावी, अशी शिकवणही त्यांनी दिली.येथील पंकज जांभळे, निलिमा पंकज जांभळे व समस्त जांभळे परिवाराने आपले वडील स्व. उद्धव जांभळे यांच्या स्मरणार्थ या भव्य कथेचे आयोजन केले आहे.
सप्ताहाचा एक भाग म्हणून सोमवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सादर करण्यात आलेले विविध आकर्षक देखावे आणि रास भजनाचा कार्यक्रम भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.संगीतमय श्रीमद् भागवत कथेचा लाभ घेण्यासाठी भक्ती परिवाराच्या सदस्यांसह परिसरातील विविध गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. भजन व इतर धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे.दि.२८ मे रोजी कथेची वेळ सकाळी ८ ते ११ वाजेदरम्यान असेल. कथेच्या समाप्तीनंतर भव्य महाप्रसाद वाटपाने या सप्ताहाची सांगता होणार आहे, अशी माहिती आयोजक जांभळे परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.











