पुणे जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या विक्रीमुळे तरुण पिढी आणि समाजाचे मोठे नुकसान होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी सांगितले की, जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम अमली पदार्थांची विक्री सुरू असून त्यामुळे गुन्हेगारी, चोरी, दरोडे आणि युवकांचे व्यसनाधीनतेकडे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. विशेषतः शाळा–महाविद्यालय परिसरातही अशा प्रकारचे प्रकार वाढत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस प्रशासनाने अमली पदार्थ विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करून या साखळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच संबंधित प्रकरणांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










