हर्णे / दापोली | प्रतिनिधी
दिनांक : २७ मे २०२६
दापोली तालुक्यातील हर्णे येथे दोन युवकांवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यानंतर हर्णे आणि दापोली परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या निषेधार्थ दापोली शहरातील केळसकर नाका परिसरात नागरिकांनी उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन करत आरोपींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्णे येथील ऐतिहासिक कनकदुर्ग किल्ला परिसरात मंगळवारी रात्री काही युवक धूम्रपान व मद्यप्राशन करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यावेळी स्थानिक युवक चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांनी त्यास विरोध केला. यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता.
हा वाद पुढे वाढत बुधवारी सायंकाळी २५ ते ३० जणांच्या जमावाने चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांच्यावर अचानक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दोघांवर उपचार सुरू; एकाची प्रकृती गंभीर
या मारहाणीत चिन्मय गुरव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. तर महेंद्र रघुवीर यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली.
हर्णे आणि दापोलीत आंदोलन
घटनेनंतर हर्णे गावात नागरिकांनी हर्णे पोलीस स्टेशन परिसर आणि बायपास भागात ठिय्या आंदोलन सुरू केले. “मुख्य आरोपींना तात्काळ अटक करा,” अशी आक्रमक मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, दापोली शहरातील केळसकर नाका परिसरातही मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमले होते. संबंधित आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
घटनेनंतर दापोली आणि हर्णे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस कुमकही मागविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण दापोली तालुक्यात परिस्थिती संवेदनशील असून पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.










