श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीला मोठा धक्का; भूमिअभिलेख कार्यालयही शिर्डीत प्रस्तावित
श्रीरामपूर / जि. अहिल्यानगर प्रतिनिधी
श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या दीर्घकालीन मागणीला राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोठा धक्का बसल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. उत्तर अहिल्यानगर विभागातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहता आणि राहुरी या तालुक्यांसाठी भूमिअभिलेख अधीक्षक कार्यालय शिर्डी येथे प्रस्तावित करण्यात आल्याने श्रीरामपूरकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
यापूर्वीही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे सुरू करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाच्या स्पर्धेत शिर्डी आघाडीवर गेल्याची चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगू लागली आहे.
श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी सन १९९१ पासून सातत्याने आंदोलन सुरू असून विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून वेळोवेळी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, सरकारकडून श्रीरामपूरच्या भौगोलिक, प्रशासकीय आणि व्यापारी महत्त्वाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
श्रीरामपूर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच न्यायालयीन कार्यालयांसारख्या महत्त्वाच्या शासकीय सुविधा उपलब्ध असतानाही महत्त्वाचे निर्णय शिर्डीच्या बाजूने घेतले जात असल्याने स्थानिकांमध्ये असंतोष वाढला आहे.
दरम्यान, या निर्णयाविरोधात कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला असून संबंधित प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. श्रीरामपूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळावा यासाठी पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही काही संघटनांकडून देण्यात आला आहे.






