आजरा:
सक्षम ग्रामपंचायत व सन्मानित सरपंच हे मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेल्या ‘सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र’ (शाखा आजरा) च्या वतीने तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचांचा सत्कार समारंभ बुधवार, दिनांक २७ मे २०२६ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच परिषद आजरा तालुक्याचे तालुकाध्यक्ष मा. श्री. पांडूरंग तोरगले (सरपंच, मासेवाडी) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सरचिटणीस मा. श्री. राजू पोतणीस, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्या मा. सौ. शारदा गुरव उपस्थित होत्या.
मान्यवरांचा यथोचित सत्कार
कार्यक्रमाची सुरुवात श्री. सुनील बागवे (उपसरपंच, बुरुडे) यांनी उपस्थित सर्व मान्यवर, तालुका कार्यकारिणी सदस्य व विविध गावांतून आलेल्या सरपंचांचे स्वागत करून केली.
यानंतर मुख्य सोहळ्यात जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ. शारदा गुरव यांच्या हस्ते पेरणोली गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वनश्री देसाई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याच धर्तीवर कोरीवडेचे सरपंच श्री. विवेक दिगंबर पाटील, चाफवडेचे उपसरपंच श्री. विजय नारायण भडांगे आणि वडकशिवालेचे उपसरपंच श्री. अमर निवृत्ती पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
आजरा तालुक्याचे काम कौतुकास्पद: इंजि. जी. एम. पाटील
आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील म्हणाले की,
”सरपंच परिषद आजराच्या पुढाकाराने तालुक्यात पर्यावरण संवर्धन (वृक्षलागवड), शाळांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, शुद्ध पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन, गावठाणाचे अचूक नकाशे (प्रॉपर्टी कार्ड) आणि शेतीपंपांच्या वीज बिलात सवलत मिळवून देणे यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. आजरा तालुक्याच्या या आदर्श उपक्रमांचे अनुकरण आता जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही होत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.”
एकसंघ कामातून ग्रामविकास साधावा: राजू पोतणीस
प्रदेश सरचिटणीस राजू पोतणीस यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,
“मा. दत्ताभाऊ काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही संघटना राज्यभर कार्यरत आहे. मला मिळालेल्या प्रदेश सरचिटणीस पदाच्या संधीमुळे आजरा तालुक्याचे नाव संपूर्ण राज्यात पोहोचले आहे. सर्व सरपंचांनी एकसंघपणे काम केल्यास ग्रामविकासाला मोठी चालना मिळेल आणि संघटनाही बळकट होईल.” यावेळी त्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सरपंच परिषदेचे सक्रिय सदस्य होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात सौ. शारदा गुरव व सत्कारमूर्ती सौ. वनश्री देसाई यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात तालुकाध्यक्ष पांडूरंग तोरगले यांनी, प्रत्येक गावाने शासकीय योजना व उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेऊन गावाचा विकास साधावा, त्यासाठी परिषद सर्वतोपरी मार्गदर्शन करेल अशी ग्वाही दिली.
लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती
या सोहळ्याला चाफवडे गावचे सरपंच धनाजी दळवी यांनी आभार मानले. कार्यक्रमास विलास जोशिलकर (सरपंच, मेंढोली), अनिल पाटील (सरपंच, मुरुडे), पांडुरंग खवरे (सरपंच, सुलगांव), लहू वाक्कर (सरपंच, किटवडे), सौ. रत्नप्रभा भुतूर्ले (सरपंच, चिथळे), मारुती बुरुड (उपसरपंच, देवर्डे), सौ. वैशाली गुरव (सरपंच, बुरुडे), वसंत कोडूसकर (उपसरपंच, सोहाळे), आनंदा कांबळे (सरपंच, गजरगाव) यांच्यासह परिसरातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









