चेतन बागुल | बागलाण प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील खमताणे येथे बिबट्याने शेतकऱ्याच्या कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरि आण्णा जाधव यांनी केली आहे.
खमताणे येथील शेतकरी विष्णू भाऊराव अहिरे यांच्या कुत्र्यांवर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला केला. कुत्र्यांचा शोध घेत असताना शेतात त्यांचे अर्धवट खाल्लेले मृतदेह आढळून आले. शेतशिवारात रात्री उशिरापर्यंत वीज नसल्याने अंधाराचा फायदा घेत बिबट्याने हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे..
यावर्षी खमताणे परिसरात अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले असून, परिसरातील ओल्या शेतांमध्ये बिबट्याच्या पायांचे ठसेही आढळले आहेत. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सध्या वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अंधारामुळे बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.
बिबट्या अंधाराचा फायदा घेत पाळीव प्राण्यांवर हल्ले करत असल्याने शेतशिवारातील रात्रीचा वीजपुरवठा बंद करू नये, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हरि आण्णा जाधव यांची प्रतिक्रिया
“खमताणे परिसरातील शेतकऱ्यांनी शेतशिवारात वावरताना विशेष काळजी घ्यावी. वन विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा,” अशी मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरि आण्णा जाधव यांनी केली.








