
पातूर | प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अकोला येथून सकाळी ८:५० वाजता आलेगावकडे येणारी तसेच आलेगाव येथून सकाळी १०:३० वाजता अकोल्याकडे जाणारी एस.टी. बस सेवा अचानक बंद करण्यात आल्याने आलेगाव व परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी केला आहे.
दररोज अकोला येथील विविध शासकीय व खासगी कार्यालयांतील कर्मचारी, शिक्षक तसेच इतर नोकरदार वर्ग या बसने प्रवास करतात. अंबाशी येथील उर्दू शाळेच्या विद्यार्थिनी तसेच आलेगाव, उंबरवाडी व परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी या बस सेवेवर अवलंबून आहेत. तसेच आलेगावहून सकाळी १०:३० वाजता अकोल्याकडे जाणाऱ्या बसमुळे पातूर येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी, देऊळगाव आयटीआयमधील विद्यार्थी तसेच शासकीय, वैद्यकीय, बँक व इतर कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होत होती.
सुमारे २० हजार लोकसंख्या असलेले आलेगाव हे परिसरातील २० ते २५ गावांसाठी प्रमुख केंद्र आहे. बस सेवा बंद झाल्यामुळे नागरिकांना अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे एस.टी. महामंडळाच्या महसुलावरही परिणाम होत असल्याचे कापकर यांनी नमूद केले.
आज सकाळी असोला फाटा येथे अनेक शाळकरी विद्यार्थिनी बसच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. सकाळी ८ वाजताची अकोला–पांगरा ताटी बस रद्द झाल्यानंतर ८:५० वाजताची अकोला–आलेगाव बसही बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली.
उंबरवाडी येथील इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी दररोज आलेगाव येथे ये-जा करतात. त्यामध्ये आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. सुरक्षित व नियमित वाहतूक उपलब्ध नसल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुलींसाठी शासनाची बस सेवा उपलब्ध असली तरी मुलांना त्या बसमध्ये प्रवास करता येत नसल्याने त्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आलेगाव–अकोला एस.टी. बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी तसेच उंबरवाडी येथील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र किंवा नियमित बस सेवेची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी केली आहे. अन्यथा आलेगाव व परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल तसेच बस सेवा विनाकारण बंद करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध परिवहन मंत्र्यांकडे लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रमुख उपस्थिती : दुर्गाबाई डिंगबर ठाकरे, लताबाई सीताराम डुकरे, शीतल प्रकाश धंदरे, रूपाली अमोल वाथे, शोभा बंडू डाखोरे, शालिनी बबन वाथे, कमलाबाई प्रकाश ताजने, लक्ष्मीबाई विष्णू तिवाले, पारूबाई विजय गायकवाड, कमलाबाई रमेश धंदरे, रुक्मा किशन शिंदे, निलेश तोताराम कापकर, समाधान झांगुजी शिंदे आणि समाधान गाढवे उपस्थित होते.




