मानवतकरांना मोठा धक्का; रोज प्रवास करणाऱ्यांना आता टोल भरावा लागणार?
“रत्नापूर येथील टोल नाका पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली; नागरिकांमध्ये संतापाची लाट”
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
मानवत : आणि पाथरी परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ (छ. संभाजीनगर रोड) वरील रत्नापूर येथील टोल नाका पुन्हा सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे रोजंदारीसाठी स्थानिक प्रवाशांना मोठी आर्थिक झळ बसणार असल्याने परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नापूर येथील टोल नाक्यावर सध्या काही काम सुरू असून सुरक्षेची यंत्रणा बसवण्यात येत आहे. विशेषतः सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्याचे काम करण्यात आले असून, यामुळे टोल नाका पुन्हा कार्यान्वित होण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच ‘डिजिटल टोल’ वसुलीची तांत्रिक तयारी पूर्ण झाल्याचेही बोलले जात आहे.
नागरिकांचा तीव्र विरोध
या टोल नाक्याला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. नागरिकांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत :
रस्ता अजून अनेक ठिकाणी खड्डेमय अवस्थेत आहे.
सर्वत्र रस्त्याचे चौपदरीकरण झालेले नाही.
टोल आकारण्यासाठी आवश्यक त्या दर्जाचा रस्ता उपलब्ध नाही.
पर्यायी रस्त्यांची व्यवस्था नसताना टोल वसुली अन्यायकारक आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाहनचालकांकडून केवळ वसुलीसाठी हा टोल नाका सुरू केला जात असल्याचा आरोप होत आहे.
पुलाच्या कामांबाबतही प्रश्नचिन्ह
अनेक नागरिकांच्या मते, या परिसरात बायपास पूल आणि रेल्वे बायपास प्रक्रियेची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे टोल वसुलीचा आधार काय असणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिक प्रवाशांवर आर्थिक भार
मानवत आणि पाथरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर नागरिक दररोज कामानिमित्त या मार्गावरून प्रवास करतात. टोल सुरू झाल्यास मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला दररोज आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.











