निघोज | प्रतिनिधी
देवीभोयरे ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच अशोकराव मुळे यांना नुकताच लोकमत वृत्तसमूहाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ तसेच ‘एम. पी. बिरला आदर्श सरपंच पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला होता. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाल्याने निघोज ग्रामस्थ आणि मळगंगा ट्रस्टच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
देवीभोयरे गावात राबविण्यात आलेल्या विकासकामांमुळे आणि लोकाभिमुख कारभारामुळे अशोकराव मुळे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सत्कार समारंभात मळगंगा ट्रस्टचे कार्याध्यक्ष वसंतराव कवाद, उपाध्यक्ष अमृता शेठ रसाळ, माजी सरपंच ठकाराम शेठ लंके, उद्योजक शिवाजीराव लंके, रमेश आण्णा ढवळे, कांदा व्यापारी संतोष शेठ रसाळ, बबनराव ससाणे, विठ्ठल शेठ कवाद, दैनिक लोकमतचे पत्रकार भास्कर शेठ कवाद, मंगेशराव वराळ, पारनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाषराव बेलोटे, माजी सरपंच विठ्ठल शेठ सरडे, मुंबईकर मंडळाचे सन्माननीय सदस्य कचर निचित, माजी उपसरपंच संपतराव वाळुंज, माजी सरपंच जयवंतराव मुळे, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान बेलोटे, सेवा संस्थेचे माजी व्हा. चेअरमन प्रकाश मोरे, बाळासाहेब बेलोटे, संचालक वसंत गायकवाड, जगदंबा पतसंस्थेचे संचालक अनिल बेलोटे, युवा नेतृत्व वैभव बेलोटे, सुरेश वाढवणे, गणेशराव बेलोटे, जगन्नाथ मगर, गोपीचंद गाजरे, तेजस मगर, अक्षय तोडकर, पत्रकार विनोद साळवे यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशोकराव मुळे यांच्या कार्याचा गौरव करत ग्रामविकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचे कौतुक केले. भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना अशोकराव मुळे यांनी हा सन्मान संपूर्ण ग्रामस्थांचा असल्याचे सांगत गावाच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.








