कुरुंदवाड | प्रतिनिधी
श्री पंचगंगा एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, अमोल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तसेच विठ्ठल मंदिर भैरववाडी वारकरी सांप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. संजय आण्णासो खोत (माजी नगराध्यक्ष) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेला ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव यावर्षीही भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. दि. ३ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत भैरववाडी येथे हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
महोत्सवादरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ वाजता काकडा आरती, सकाळी ६ ते ७ वाजता श्रींची पूजा-अर्चा, सकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ वाजता हरिपाठ आणि सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात अध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
कीर्तन सेवेसाठी विविध मान्यवर कीर्तनकारांनी उपस्थित राहून आपल्या प्रभावी कीर्तनातून अध्यात्म, संस्कार आणि भक्तीचे महत्त्व भाविकांसमोर मांडले. जीवनाचा खरा आनंद भक्तीमार्गात आणि नामस्मरणात असल्याचे विविध दाखले देत कीर्तनकारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या धार्मिक सोहळ्यात व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. बाळासाहेब शिंदे तारदाळकर यांनी जबाबदारी सांभाळली. चोपदार म्हणून संजय चव्हाण (नांदणी), विणेकरी म्हणून बाबासाहेब रायमाने (नांदणी), मृदंगाचार्य म्हणून शीतल चव्हाण (मजरेवाडी) व कुमार जाधव यांनी सेवा दिली. तसेच गायनाचार्य म्हणून किशोर भाट, गजानन कदम व संजय काटे, तर हार्मोनियम साथीसाठी पांडुरंग सासपडे व कपिल तराळ यांनी सुरेल साथ दिली.
याशिवाय शिरोळ तालुक्यातील भजन वेडे ग्रुप तसेच कुरुंदवाड व भैरववाडी येथील टाळकरी आणि वारकरी मंडळींनी भजन, नामस्मरण व साथसंगतीद्वारे कार्यक्रमाची शोभा वाढवली.
अमोल गणेश मंडळ चौक, चव्हाण मळा, भैरववाडी येथे आयोजित या सप्ताहात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
या महोत्सवाचे संयोजन डॉ. सुनील चव्हाण (माजी नगराध्यक्ष, कुरुंदवाड नगरपरिषद) तसेच अमोल गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले. त्यांच्या नियोजनबद्ध आणि परिश्रमपूर्वक केलेल्या कार्यामुळे महोत्सव यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.










