प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत दि. ५ जून २०२६ रोजी पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. उद्योजक श्री. लक्ष्मण दादा जाधव (झांजवड) यांच्या उदार आर्थिक सहकार्याने स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून पालघर व पुणे येथील NDRF केंद्रांमध्ये एकूण ५०० फळझाडांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण संरक्षण, हरित विकास आणि भावी पिढ्यांसाठी शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे NDRF च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. समाजहित आणि पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेल्या या स्तुत्य पुढाकाराबद्दल श्री. लक्ष्मण दादा जाधव यांचे विशेष आभारही व्यक्त करण्यात आले.
यावेळी उद्योजक श्री. सीताराम जाधव (वलवण) यांच्या माध्यमातून लक्ष्मी फुड्सतर्फे विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश दिला.
वृक्षारोपणासोबतच पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि समाजामध्ये हरित विचारांची रुजवण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
स्वराज्य फाउंडेशन, NDRF तसेच सर्व मान्यवरांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.










