तिवसा | प्रतिनिधी
अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना जोडणारा वर्धा नदीवरील ऐतिहासिक दगडी पूल आजही इंग्रजकालीन अभियांत्रिकी कौशल्याची साक्ष देत उभा आहे. तब्बल 110 वर्षांचा इतिहास लाभलेल्या या पुलाने अनेक पिढ्यांचा प्रवास सुलभ केला असून आजही तो इतिहासाच्या खुणा जपून ठेवत आहे.
ब्रिटिश राजवटीच्या काळात दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन, दवाखाने, शाळा, मुसाफिरखाने आणि पूल यांसारख्या विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली. त्याच काळात वर्धा नदीवर दगडी पूल उभारण्याची योजना आखण्यात आली.
पूर्वी या ठिकाणी माती-दगडाचा बंधारा होता. त्यावरून पायदळ, घोडदळ आणि बैलगाड्यांची वाहतूक होत असे. मात्र पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर संपर्क पूर्णपणे तुटत असे. नदी पार करण्यासाठी डोंग्यांचा आधार घ्यावा लागत होता, परंतु पुराच्या काळात हा प्रवास अत्यंत धोकादायक ठरत होता.
वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने 1914 साली पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली. या कामासाठी अभियंता जॉर्ज फॅब्रिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे बांधकामासाठी बाहेरील मजूर न आणता परिसरातील गावांमधील लोकांनाच रोजगार देण्यात आला.
भारसोडा, भारवाडी, विष्णूर, परतोडा, खडका, खडकी, वरखेड, तारखेड, जळगाव, चिस्तूर, फत्तेपूर, तळेगाव, आष्टी यांसह अनेक गावांतील महिला व पुरुष या कामात सहभागी झाले. त्या काळात मजुरांना एक रुपया तर बैलगाडीधारकांना दीड रुपया मजुरी दिली जात होती.
पुलासाठी लागणारा दगड वर्धा नदीच्या पात्रातूनच काढण्यात आला. चुनखडी, जवस तेल, डिंक, उडीद डाळ आणि विविध झाडांच्या सालींच्या मिश्रणातून विशेष बांधकाम मसाला तयार करण्यात आला. नदीच्या पात्रात 25 कमानींचा भक्कम पाया घालून पुलाची उभारणी करण्यात आली. दगडांवरील कोरीव कामासाठी पश्चिम बंगालमधील कारागिरांची मदत घेण्यात आली होती.
पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे साडेचार ते पाच वर्षांचा कालावधी लागला. अखेर 1917 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आजही पुलावरील दगडी शिलालेख त्याच्या इतिहासाची साक्ष देतो.
या पुलाच्या बांधकामामुळे परिसरातील दळणवळणाला मोठी चालना मिळाली. त्यानंतर तिवसा येथील रेस्टहाऊस, पोलीस स्टेशन, मुसाफिरखाना, प्राथमिक शाळा आणि पिंगळा नदीवरील पुलासारख्या अनेक सार्वजनिक इमारतींची उभारणी झाली.
1990 नंतर सुरक्षेच्या कारणास्तव या जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर 1989-90 मध्ये पहिला नवीन पूल आणि 2004-05 मध्ये दुसरा पूल बांधण्यात आला. त्यामुळे सध्या वर्धा नदीवर एकूण तीन पूल अस्तित्वात आहेत.


1917 मध्ये उभारलेला हा दगडी पूल आजही पुराच्या प्रचंड तडाख्यांना तोंड देत भक्कमपणे उभा आहे. शतकाहून अधिक काळ उलटल्यानंतरही त्याची मजबुती कायम असल्याने हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग नसून ऐतिहासिक आणि स्थापत्य वारशाचे जिवंत प्रतीक बनला आहे.
— शब्दांकन : प्रा. डॉ. रवी दलाल, तिवसा
— संकलन : विद्रोही अविनाश गोंडाणे




