निमगावजाळी | प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड परिसरात गॅंग बदलल्याच्या वादातून एका तरुणावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंधवणी रोड परिसरातील प्रसाद कान्हे हा तरुण पूर्वी येथील एका गटाशी संबंधित होता. अनेक वर्षे त्या गटासोबत राहिल्यानंतर त्याने दुसऱ्या गटात प्रवेश केल्याची माहिती आहे. याच कारणावरून दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, “खबरी देणे” आणि “विश्वासघात केल्याचा” संशय व्यक्त करत संतप्त झालेल्या पहिल्या गटातील काही सदस्यांनी मोटारसायकलवर येऊन गोंधवणी रोडवरील एज्युकेशन शाळेसमोर प्रसाद कान्हे याला गाठले. त्यानंतर त्याच्यावर जबर मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेदरम्यान स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या कान्हेवर गोळीबार झाल्याची चर्चा परिसरात रंगली होती. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे गोळीबार झाला की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी झाली. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) श्री. भवर आणि पोलीस निरीक्षक श्री. देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि संबंधित आरोपींची माहिती तपासातून समोर येणार आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.









