प्रतिनिधी :
जिल्हा बँक निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत मोठी घडामोड घडली असून कन्नडच्या आमदार संजनाताई जाधव यांचा निवडणूक अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी एकूण 214 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 113 अर्ज वैध ठरले असून 45 अर्ज बाद करण्यात आले आहेत. बाद झालेल्या यादीत अनेक महत्त्वाच्या उमेदवारांचा समावेश असल्याने छाननी प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
बाद झालेल्या उमेदवारांमध्ये कन्नडच्या आमदार संजनाताई जाधव यांच्यासह सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांचाही अर्ज बाद झाला आहे. तसेच कन्नडचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद यांचाही वैयक्तिक मतदारसंघातील अर्ज बाद करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आ. संजनाताई जाधव ज्या संस्थेमार्फत निवडणुकीत सहभागी झाल्या होत्या त्या संस्थेला दोन वर्षांची सभासद अट पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे.
दरम्यान, या निवडणुकीत महायुतीकडून मोठ्या प्रमाणात उमेदवार उतरले असून भाजपचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट, काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे तसेच अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांचेही अर्ज दाखल आहेत.
जिल्हा बँक ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची संस्था असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून अंतिम निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याबाबत उत्सुकता वाढली आहे.










