परभणी | प्रतिनिधी :
सोनपेठ तालुक्यातील मोहोळा येथील तीन महिलांचा गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण मोहोळा गावात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये कु. समीक्षा उत्तमराव जाधव (वय 16 वर्षे), कु. उत्कर्षा उत्तमराव जाधव (वय 18 वर्षे) या सख्ख्या बहिणी तसेच त्यांची चुलती सिंधूबाई दत्ताराव जाधव (वय 45 वर्षे) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास तिघीही गोदावरी नदीवर अंघोळीसाठी गेल्या होत्या. अंघोळ करत असताना समीक्षा आणि उत्कर्षा या दोघींचा पाण्यावरील ताबा सुटल्याने त्या बुडू लागल्या. हे लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी सिंधूबाई जाधव यांनी तत्काळ नदीत उडी घेतली. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्या देखील पाण्यात बुडाल्या.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर तिघींचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. गावातील दोन तरुण मुली आणि त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
या प्रकरणी दौलतराव जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून Sonpeth Police Station येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
