पालघर | प्रतिनिधी :
जव्हार तालुक्यातील खरवंद येथील राऊत फार्महाऊसवर रविवारी (दि. 14 जून) प्रो-ट्रे आधारित यांत्रिक भात लागवडीसाठी ट्रेमध्ये भात पेरणीचे प्रात्यक्षिक उत्साहात पार पडले. भात शेतीतील वाढता उत्पादन खर्च कमी करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यांत्रिक भात लागवड पद्धतीमध्ये भाताची रोपे विशेष प्रो-ट्रेमध्ये तयार केली जातात. त्यानंतर भात लावणी यंत्राच्या साहाय्याने शेतात लागवड केली जाते. या पद्धतीमुळे पारंपरिक लागवडीतील राब करणे, रोपे उपटणे आणि पुनर्लागवडीसाठी लागणारा मोठा मजुरी खर्च वाचतो. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात लक्षणीय बचत होत असून शेती अधिक किफायतशीर बनत आहे.
खरवंद येथील प्रगतशील शेतकरी सदाशिव राऊत आणि बाळकृष्ण चौधरी हे गेल्या चार वर्षांपासून यांत्रिक भात लागवडीचा यशस्वी अवलंब करत आहेत. या तंत्रज्ञानामुळे मजुरी खर्चात बचत, वेळेची बचत आणि कामात सुलभता मिळाल्याचा अनुभव त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर मांडला.
या प्रात्यक्षिकावेळी कोसबाड येथील Krishi Vigyan Kendra Kosbad चे संशोधक भरत कुशारे यांनी शेतकऱ्यांना यांत्रिक भात लागवडीचे फायदे, प्रो-ट्रे व्यवस्थापन आणि आधुनिक लागवड तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना प्रो-ट्रे तसेच भात लावणी यंत्राची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, विनवळ येथील शेतकरी लता मोरघा आणि बबन मोरघा यांनी यंदा प्रथमच प्रो-ट्रे यांत्रिक भात लागवडीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी या प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भात शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी अशा प्रात्यक्षिकांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये यांत्रिक भात लागवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली असून या तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.
