प्रतिनिधी
मसवड-पंढरपूर मार्गावरील तांदळवाडीजवळ अत्यंत दुर्दैवी अपघात घडला असून भाविकांनी भरलेला पिकअप वाहन रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासात असताना तांदळवाडीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट रस्त्याशेजारील विहिरीत कोसळला.
या भीषण अपघातात महिला व लहान मुलांसह अनेक भाविकांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ६ जणांना जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. विहिरीत कोसळलेल्या वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य राबविण्यात आले.
या दुर्घटनेमुळे रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
