कुरुंदवाड | प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील कुमार विद्या मंदिर क्रमांक ३ या शाळेची केंद्र शासनाच्या पीएम श्री योजनेसाठी निवड झाली असून, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल जिल्हा परिषद शिक्षण समितीकडून विशेष कौतुक करण्यात आले. तसेच शाळेसाठी १३ नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी २ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या शिक्षण समितीने वार्षिक आढावा बैठकीनिमित्त शाळेला भेट दिली. यावेळी शाळेची वाढती विद्यार्थी संख्या, शैक्षणिक गुणवत्ता आणि विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. शाळेच्या प्रगतीबद्दल समिती सदस्यांनी समाधान व्यक्त करत शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
बैठकीच्या प्रारंभी मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांनी मान्यवरांचे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. एकेकाळी कमी पटसंख्येमुळे अडचणीत असलेल्या शाळेने आज केलेली उल्लेखनीय प्रगती सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
शाळेतील वाढत्या विद्यार्थ्यांमुळे वर्गखोल्यांची कमतरता निर्माण झाली होती. याची दखल घेत शिक्षण समितीने १३ नवीन वर्गखोल्यांसाठी २ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. भविष्यात शाळेच्या विकासासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त निधीही उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण समितीच्या सभापती शीतल यादव यांनी दिले.
दरम्यान, “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या राज्यस्तरीय स्पर्धेत विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षकांनी परिधान केलेला एकसमान ड्रेस कोड आणि शिस्तबद्ध वातावरण हे बैठकीचे विशेष आकर्षण ठरले.
यावेळी शिक्षण समितीच्या सभापती शीतल यादव, सदस्य रेखा मुगडे, सानिका आवाडे, स्नेहल वेल्हाळ, उत्तरा शिंदे, शुभांगी कुंभार, अमरसिंह चव्हाण, एकनाथ पाटील, भगवान पाटील तसेच जिल्हा परिषद आरोग्य समिती सदस्य प्रशांत शहापुरे उपस्थित होते.
याशिवाय प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडकर, सुवर्णा सावंत, म्हेत्रे, उपशिक्षणाधिकारी शशिकांत बडे, काकडे, विस्तार अधिकारी दबडे, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व शिक्षा अभियानाचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेचे अभियंता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या या यशाबद्दल आणि शिक्षण समितीने दाखविलेल्या विश्वासाबद्दल पालक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांकडून शाळा व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
