कुरुंदवाड | प्रतिनिधी
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे महेश्वरी यात्री निवासमध्ये पार पडली. बैठकीत पक्षवाढ, संघटनात्मक बांधणी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला मार्गदर्शन करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी सांगितले की, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी आणि जनहिताच्या मुद्द्यांसाठी सक्रियपणे काम करणार आहे. सत्ताधारी मित्रपक्षाचा घटक असूनही जनतेच्या प्रश्नांवर संघर्षाची भूमिका कायम ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हानिहाय जनआंदोलने उभी करावीत, लोकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. समाजामध्ये पक्षाविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी संघटनात्मक कामकाज अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला.
यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या भागातील सामाजिक, आर्थिक आणि संघटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच पक्षाला तळागाळात अधिक बळकटी देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक गायकवाड यांनी केले.
बैठकीस महासचिव प्रशांत ननावरे, प्रदेश उपाध्यक्ष पंकज मनोहर, आप्पासाहेब साळवे, पुष्पराज कांबळे, चैतन्य वाघमारे, विजय शितळे, विलास सुकठणकर, प्रमोद भालेकर, अशोक ससाणे, शंकर आलेकर, ॲड. श्रीकृष्ण वंश, सलीम काजी, मिथुन कांबळे, श्रीधर आडेकर, शाहीर अमर शेख, प्रा. जाधवर, चंद्रकांत वाघमारे, कुंदन खरात, बाळासाहेब सोनवणे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी महासचिव प्रशांत ननावरे यांनी आभार मानले.
