प्रतिनिधी :
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने शांतिदूत मर्दानी आखाडा, नवी मुंबई यांच्या वतीने किल्ले रायगड येथे गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या मोहिमेचे नेतृत्व आखाड्याचे अध्यक्ष वस्ताद सागर मकामले यांनी केले.
रविवार, दि. १४ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एकूण १०६ जणांनी सहभाग नोंदवला. मोहिमेदरम्यान किल्ला परिसरातील स्वच्छता करण्यात आली तसेच सहभागी नागरिकांना रायगड किल्ल्याचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि गड-किल्ल्यांचे संवर्धन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना शिवकालीन युद्धकलेची माहितीही देण्यात आली. शांतिदूत मर्दानी आखाड्यामार्फत अत्यंत माफक शुल्कात तलवारबाजी, लाठी-काठी, भाला, विटा तसेच इतर पारंपरिक मर्दानी युद्धकला शिकविल्या जात असल्याची माहिती वस्ताद सागर मकामले यांनी दिली.
गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून भविष्यातही अशा विविध जनजागृती व स्वच्छता मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे सहभागी नागरिकांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून गड-किल्ले संवर्धनाच्या कार्याला बळ मिळाले आहे.

