शहादा | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या केंद्रप्रमुखांच्या पदांवर लवकरच ४५ नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या पुढाकारामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेली पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून विविध तांत्रिक कारणांमुळे केंद्रप्रमुख पदभरती रखडली होती. त्यामुळे अनेक केंद्रांवर प्रभारी व्यवस्था सुरू होती आणि एका केंद्रप्रमुखाकडे अनेक केंद्रांचा अतिरिक्त कार्यभार होता. याचा परिणाम शाळांचे नियमित पर्यवेक्षण, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय कामकाजावर होत होता.
नंदुरबारसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची कमतरता ही गंभीर समस्या बनली होती. मात्र, शासनाने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग मोकळा केल्यानंतर ही प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली. नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील अनेक अनुभवी व गुणवंत शिक्षकांनी यश संपादन केले आहे.
या ४५ केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीनंतर ग्रामीण व आदिवासी भागातील शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. शिक्षकांना योग्य मार्गदर्शन, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि केंद्रस्तरीय प्रशासन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या जिल्हा परिषद प्रशासनाकडून निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि अन्य प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसांत नियुक्ती आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नांमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने शिक्षक, शिक्षणप्रेमी, पालक आणि विविध शिक्षक संघटनांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून जिल्हाभर आनंदाचे वातावरण आहे.
