शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालण्याची वेळ; अपघात झाल्यास जबाबदार कोण?
नेरूळ : नेरूळ येथील तेरणा महाविद्यालयाच्या शेजारील फुटपाथवर झाडांच्या तोडलेल्या फांद्या व कचऱ्याचा मोठा ढिगारा टाकण्यात आल्याने पादचाऱ्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा सुरू झाल्यामुळे दररोज सकाळी मोठ्या संख्येने विद्यार्थी या परिसरातून ये-जा करतात. मात्र, फुटपाथ अडविला गेल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्यावरून चालावे लागत आहे.
विशेष म्हणजे, शाळा सुरू होण्यापूर्वी अनेक लहान मुले याच फुटपाथवर रांगेत उभी राहत असतात. सध्या मात्र झाडांच्या फांद्या आणि कचऱ्याचा ढिगारा टाकण्यात आल्याने विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठीही जागा उपलब्ध नसून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन फुटपाथवरील अडथळे हटवावेत, अशी मागणी केली आहे. “एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?” असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक प्रशासन, महापालिका आणि संबंधित विभागांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कारवाई करून फुटपाथ मोकळा करावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.
