रिसोड | प्रतिनिधी
रिसोड शहरातील अनेक भागांमध्ये पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील अनेक नाले तुंबलेल्या अवस्थेत असून, नियमित साफसफाई होत नसल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नगरपरिषदेच्या साफसफाई व्यवस्थेची पोलखोल होत असून, अनेक परिसरांमध्ये नाल्यांमधील गाळ व कचरा अद्यापही हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही भागांत रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
दर महिन्याला नियमित साफसफाई होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी अशाच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व नाले आणि गटारींची तातडीने साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
