रायगड | प्रतिनिधी
भगवान बिरसा मुंडा स्मृतिदिनानिमित्त राज्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकास, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला भव्य कार्यक्रम लोकभवन, मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नारहरी झिरवळ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच आस संस्थेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते. आदिवासी संस्कृती, परंपरा आणि कला यांचे दर्शन घडविणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आदिवासी कलाकारांनी पारंपरिक नृत्य, लोककला आणि सांस्कृतिक सादरीकरणातून आपल्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडविले.
कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि भावी धोरणांबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
