कुरुंदवाड | प्रतिनिधी :
जलसंधारण विभागांतर्गत शिरोळ उपविभागीय पाटबंधारे उपविभाग, शिरोळ-कुरुंदवाड शाखेकडून पंचगंगा नदीवरील इचलकरंजी ते शिरोळ बंधाऱ्यादरम्यान लागू करण्यात आलेली उपसा बंदी तातडीने उठवावी, अशी मागणी पंचगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रकाश येसने यांना निवेदन सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगा नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले असून ते पिण्यायोग्य राहिलेले नाही. बहुतांश गावांमध्ये नदीचे पाणी पिण्यासाठी वापरले जात नसून त्याऐवजी पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नदीतील उपलब्ध पाण्याचा वापर मुख्यत्वे शेतीसाठीच केला जात आहे.
मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता इचलकरंजी ते शिरोळ बंधाऱ्यादरम्यान अचानक उपसा बंदी लागू करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सध्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असून वाढत्या उन्हामुळे पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारे साहित्य व तयारी करून ठेवली असून, अशा परिस्थितीत सिंचनासाठी पाणी न मिळाल्यास पिके जळून जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी शेतकरी नेते धनाजी चूडमुंगे आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली. “प्रोसेस व सायझिंग उद्योगांचा पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र शेतीसाठी पाणी बंद केले जात आहे. पंचगंगेतील सांडपाणी पुढे कृष्णा नदीत मिसळत असून त्याचा उपयोग पिण्यासाठी कोणीही करत नाही. त्यामुळे हे पाणी शेतीसाठी वापरण्यास परवानगी द्यावी,” अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पंचगंगा नदीवरील विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यरत असल्या तरी नदीचे पाणी रासायनिक सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. जलसंधारण विभागाच्या परिपत्रकानुसार धरणातील पिण्याच्या पाण्याचा साठा वगळता इतर वापरांवर बंदी घालण्याचा नियम आहे. मात्र पंचगंगा नदीचे पाणी आधीच पिण्यास अयोग्य असल्याने शेतीसाठी उपसा बंदी लावणे अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
उपसा बंदीमुळे शेतीचे नियोजन विस्कळीत होणार असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इचलकरंजी ते शिरोळ बंधाऱ्यादरम्यान लागू करण्यात आलेली उपसा बंदी तातडीने हटवावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
यावेळी धनाजी चूडमुंगे, दिपक पाटील, प्रभाकर बंडगर, बंडू बरगाले, राकेश जगदाळे, गोपाळ चव्हाण, रावसाहेब गवळी, सर्जेराव बाबर आदी शेतकरी उपस्थित होते.
