कुरुंदवाड | प्रतिनिधी
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर पाटबंधारे विभागाकडून शेती पंपांवर अचानक उपसा बंदी लागू करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी कुरुंदवाड येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. यावेळी उप कार्यकारी अभियंता प्र. म. येसने यांची भेट घेऊन उपसा बंदीचा आदेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांनी सांगितले की, सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून अनेक ठिकाणी ऊस लागवड तसेच भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र उपसा बंदीमुळे सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून त्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत, “उपसा बंदीचा आदेश पिण्याचे पाणी वगळता इतर सर्व वापरांसाठी लागू असल्याचे सांगितले जात आहे. मग औद्योगिक वापरासाठी पाण्याला सूट का दिली जात आहे?” असा सवाल उपस्थित केला.
शेतकऱ्यांनी पुढे स्पष्ट केले की, इचलकरंजीपासून पुढे पंचगंगा नदीवरून कोणत्याही गावाचा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे इचलकरंजीपासून नरसिंहवाडी संगमापर्यंत लागू करण्यात आलेली उपसा बंदी मुळात चुकीची असून ती तातडीने उठवावी.
उपसा बंदी कायम ठेवल्यास शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतीचे संपूर्ण नियोजन विस्कळीत होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, गोपाळ चव्हाण, बंडू बरगाले, प्रभाकर बंडगर, गोवर्धन माने, आनंदा भातमारे, कमिल इनामदार, शिवाजी काळे, अनिल हुपरीकर, संभाजी माने यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
