प्रतिनिधी | परभणी
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. निवडणुकीनंतर पाथरी येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी विविध नेत्यांचे आभार मानले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटकर यांचे नाव टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पत्रकार परिषदेत सईद खान यांनी मंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपुडकर, काँग्रेस नेते आमदार सतीश वानखेडे, दोन्ही जिल्ह्यातील आमदार-माजी आमदार, महायुतीतील नेते तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. मात्र, महायुतीतील घटक पक्षाचे महत्त्वाचे नेते असलेल्या आमदार राजेश विटकर यांचा उल्लेख त्यांनी टाळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
याबाबत पत्रकारांनी थेट प्रश्न विचारल्यानंतरही सईद खान यांनी मौन बाळगले. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेदरम्यान खासदार संजय जाधव यांच्या संभाव्य शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर सईद खान यांनी थेट भाष्य न करता मान हलवत सकारात्मक संकेत दिल्याचे उपस्थितांनी सांगितले. या हालचालीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला आहे. एका बाजूला शिवसेना (शिंदे गट) तर दुसऱ्या बाजूला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मित्रपक्ष अशी लढत झाली. निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून, महायुतीकडे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
आता २३ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत नेमका कोण बाजी मारतो, याकडे संपूर्ण परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
