पाथरी | प्रतिनिधी
परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या शिवसेनेतील पुनरागमनाचे स्वागत करत हा कोणताही नवीन पक्षप्रवेश नसून त्यांच्या मूळ घरातच परत येण्याचा क्षण असल्याची भावना शिवसेना जिल्हाप्रमुख सईद खान यांनी व्यक्त केली. पाथरी येथील शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सईद खान म्हणाले की, खासदार संजय जाधव हे अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या विचारसरणीशी आणि संघटनात्मक कार्याशी घट्ट जोडलेले आहेत. त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शिवसेना संघटनेला मोठे बळ मिळणार आहे.
आगामी काळात शिवसेना अधिक ताकदीने जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरेल आणि विकासाच्या मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन पाथरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिवसेना भवनापासून पंचायत समिती कार्यालयापर्यंत खासदार संजय जाधव यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. पंचायत समिती कार्यालयासमोर त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून स्वागत करण्यात आले.
पत्रकार परिषदेदरम्यान सईद खान यांनी राज्यातील महायुती सरकारच्या कामकाजाचाही उल्लेख केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध विकासकामांना गती मिळाल्याचा दावा करत त्यांनी सरकारबद्दल जनतेमध्ये सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले. लोकहिताच्या निर्णयांमुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळे शिवसेना व महायुतीला व्यापक जनसमर्थन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्य, विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी तसेच महायुतीचे पदाधिकारी एकजुटीने काम करत असल्याने निवडणुकीत अपेक्षित यश मिळेल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष आसेफ खान, उपनगराध्यक्ष आलोक चौधरी, नगरसेवक उद्धव नाईक, अमोल भाले पाटील, जिल्हा परिषद सभापती कृष्णा शिंदे, सर्जेराव गिराम, विक्रम गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. संजय जाधव यांच्या पुनरागमनामुळे जिल्ह्यातील शिवसेना संघटनेला नवसंजीवनी मिळेल आणि आगामी राजकीय घडामोडींमध्ये पक्ष अधिक ताकदीने उभा राहील, असा विश्वास यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
