भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ग्रामपंचायत कारभार चर्चेत; निलंबनाची मागणी
कन्नड | प्रतिनिधी
कन्नड तालुक्यातील आडगाव (पि.) येथील ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप समोर आल्याने प्रशासन व ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामसेवक जंजाळ यांनी बनावट वसुली पावत्या देत ग्रामस्थांसह शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.
आडगाव येथील तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अमोल वसंतराव भोसले यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे पंचायत प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ग्रामनिधी व पाणीपट्टी वसुलीसाठी न्यायालयीन नोटिसांचा धाक दाखवत ग्रामस्थांकडून सक्तीने वसुली करण्यात आली. मात्र नागरिकांकडून जमा करण्यात आलेली रक्कम शासकीय खात्यात जमा न करता बनावट पावत्या देऊन ती परस्पर हडप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय प्रत्यक्ष ग्रामसभा न घेता खोटे इतिवृत्त तयार करण्यात येत असल्याचाही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचा आर्थिक हिशोब मागणाऱ्या नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात तसेच धमकावले जात असल्याचेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.
गावात करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, संबंधित रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप आहे. या कामाची सखोल चौकशी होईपर्यंत संबंधित बिल अदा करू नये, अशी मागणी तक्रारदारांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अमोल वसंतराव भोसले यांनी दिला आहे.
या आरोपांमुळे आडगाव ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासन याप्रकरणी कोणती भूमिका घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
