ग्रामस्थांनी मांडल्या समस्या; आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे तातडीने पाठपुराव्याचे आश्वासन
चिचोंडी पाटील :
नगर-श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “आमदार आपल्या गावी – गावभेट दौरा” या लोकाभिमुख उपक्रमास चिचोंडी पाटील येथे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील संगम चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध समस्या, तक्रारी, मागण्या तसेच विकासासंदर्भातील सूचना थेट आमदारांसमोर मांडल्या.
या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली. यावेळी महसूल, वीज, रस्ते, पाणीपुरवठा, शेती, आरोग्य, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न नागरिकांनी मांडले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काही प्रश्नांकडेही आमदारांचे लक्ष वेधण्यात आले.
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी ग्रामस्थांच्या समस्या काळजीपूर्वक ऐकून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. नागरिकांच्या अडीअडचणी, शासकीय कामकाजातील अडथळे आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तक्रारींचे तातडीने आणि योग्य पद्धतीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमास तहसील प्रशासन, पंचायत समिती, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, कृषी विभाग तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनीही ग्रामस्थांच्या समस्या समजून घेत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे माजी सरपंच मनोज कोकाटे यांनी प्रभावीपणे केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते बाजीराव हजारे, पांडुरंग ससे, बाळासाहेब ठोंबरे, माजी सरपंच अमोल कोकाटे, अशोकराव कोकाटे, कल्याण ठोंबरे सर, माजी उपसरपंच महादजी कोकाटे, माजी उपसरपंच भाऊसाहेब ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बेल्हेकर, भाजपा युवानेते विजय गाडे, गंगाधर कोकाटे, बाप्पू कोकाटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामस्थांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावाच्या विकासासाठी विविध सूचना मांडल्या. त्यामुळे कार्यक्रमाला लोकसहभागाचे स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, “जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणे हीच लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. गावाच्या विकासासाठी आलेल्या प्रत्येक मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागांच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. विकासाच्या प्रक्रियेत कोणताही गाव मागे राहणार नाही, यासाठी आपण कटिबद्ध आहोत.”
ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण, लोकाभिमुख आणि यशस्वी वातावरणात पार पडला.
चौकट
“आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी आयोजित केलेला ‘आमदार आपल्या गावी’ हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. गावातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत नाहीत. लोकप्रतिनिधी व प्रशासन थेट गावात आल्याने अनेक प्रश्न तातडीने मार्गी लागण्यास मदत होत आहे.”
— मनोज कोकाटे
माजी तालुकाध्यक्ष, भाजपा
माजी सरपंच, चिचोंडी पाटील
