पुढील ४० ते ४५ दिवसांच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली
आमदार माऊलीआबा कटके यांच्या पाठपुराव्यास नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे व पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनिता पोटे यांचे समन्वयपूर्ण सहकार्य
पुणे प्रतिनिधी
शिरूर : मान्सूनच्या आगमनास विलंब होण्याची शक्यता, वाढते तापमान आणि पिण्याच्या पाण्याबाबत निर्माण झालेली संभाव्य चिंता लक्षात घेता शिरूरकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. घोडनदीवरील हत्तीडोह येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता तूर्तास दूर झाली असून, उपलब्ध जलसाठा पुढील ४० ते ४५ दिवस पुरेल, अशी माहिती शिरूर नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.
सुमारे ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शिरूर शहराचा पाणीपुरवठा घोडनदीवरील हत्तीडोह बंधाऱ्यावर अवलंबून आहे. सुमारे ५५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेला हा बंधारा सध्या पूर्ण क्षमतेने भरला असून, त्यामुळे शहरासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी, आगामी काही आठवड्यांतील पाणीटंचाईची शक्यता मोठ्या प्रमाणात टळली आहे.
शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन शिरूर नगरपरिषदेने कुकडी विभागाच्या ६१ क्रमांकाच्या वितरिकेतून हत्तीडोह बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला गती देण्यासाठी शिरूर-हवेलीचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊलीआबा कटके यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शिरूर शहरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.
या प्रयत्नांना नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे तसेच पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनिता पोटे यांनी प्रभावी समन्वय साधत सहकार्य केले. विविध स्तरांवर केलेल्या समन्वयात्मक प्रयत्नांना यश मिळाल्याने हत्तीडोह बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून, शिरूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील ४० ते ४५ दिवसांसाठी मार्गी लागला आहे.
बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनिता पोटे, महिला व बालकल्याण समिती सभापती आयेशा सय्यद, नगरसेविका संगीता मल्लाव, नगरसेवक अभिजीत पाचर्णे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी यांनी हत्तीडोह बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध जलसाठ्याची माहिती घेतली व पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला.
मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन शिरूर नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
नगरपरिषद प्रशासनाचे आवाहन :
“हत्तीडोह बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शिरूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला असून, उपलब्ध जलसाठा पुढील ४० ते ४५ दिवस पुरेल. नागरिकांनी पाण्याचा जपून व जबाबदारीने वापर करून नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे.”
— शिरूर नगरपरिषद प्रशासन
