प्रतिनिधी :
कळंब तालुक्यातील शरद गावात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नळयोजनेचे पाणी नियमितपणे सोडले जात नसल्याने गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पूर्वी गावातील नळयोजनेचे पाणी कर्मचारी मनोज मेश्राम हे सोडत होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या जागी विशाल आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, विशाल आत्राम यांना संपर्क साधल्यास ते “मी पाणी सोडत नाही, मनोज मेश्राम पाणी सोडतात,” असे सांगतात. तर मनोज मेश्राम यांना विचारणा केल्यास ते विशाल आत्राम यांचे नाव पुढे करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नेमके पाणी कोण सोडते, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गावात वापरण्यायोग्य पाण्याची विहीर असली तरी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र वॉटर सप्लाय विहीर उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी तब्बल एक किलोमीटर अंतर पार करावे लागत असून, सध्या सुरू असलेल्या पेरणीच्या हंगामात अनेक महिलांना २०० ते २५० रुपयांची मजुरी सोडून घरी राहून पाणी भरण्याची वेळ येत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावच्या सरपंच सौ. वंदनाताई मधुकर लिल्हारे यांचा कार्यकाळ संपलेला असून ग्रामपंचायत कर्मचारी मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. “आम्हीच मालक” अशा भूमिकेतून प्रशासन चालवले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी तसेच पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



