मारेगाव प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथील उंबरे यांनी विविध मागण्यांसाठी थेट तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला आता सात दिवस उलटले असून, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
या उपोषणाचे नेतृत्व राजू निमसटकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, करणवाडी ते खडकी, खडकी ते घोरदडा आणि घोरदडा ते नरसाळा या शिवदुरा पांदण रस्त्याची तातडीने दुरुस्ती व मार्ग मोकळा करण्यात यावा, ही मुख्य मागणी करण्यात आली आहे.
उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही अधिकारी प्रत्यक्ष पाहणी न करता कार्यालयात बसूनच निर्णय घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, आंदोलनकर्त्यांनी आपल्या गुरेढोऱ्यांसह तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांसोबत गाय, वासरे आणि बैलजोडीही आंदोलनस्थळी बसल्याचे चित्र पाहायला मिळत असून, या आंदोलनाने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
“एकीकडे अन्नत्याग करून आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे जनावरेही उपोषणस्थळी आहेत; मात्र प्रशासनाला याची दखल घ्यावीशी वाटत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
उपोषणकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला असता, “जो रस्ता अडवत असेल त्याच्याविरोधात तक्रार द्या,” असे उत्तर मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, वाद वाढवण्यापेक्षा प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
तालुक्यातील अनेक नागरिकांनी या प्रश्नावर प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून उपोषणकर्त्यांच्या मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.
