उमरखेड | प्रतिनिधी :
गावातील स्मशानभूमीत गेल्या सुमारे ६० वर्षांपासून दहन शेडची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. या मूलभूत सुविधेसाठी प्रहारचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण इंगळे यांनी सलग तीन वर्षे विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे.
या प्रयत्नांमुळे अखेर स्मशानभूमी दहन शेडचे काम पूर्ण होऊन ग्रामस्थांसाठी सुविधा उपलब्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक २०२६ जवळ येत असताना काही सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी या कामाचे श्रेय स्वतःकडे घेत असल्याचा आरोप प्रवीण इंगळे यांनी केला आहे.
“गावाच्या विकासासाठी केलेल्या कामांचे खरे श्रेय ज्यांनी प्रत्यक्ष पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला, त्यांनाच मिळायला हवे. जनतेची दिशाभूल करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होऊ नये,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी गावातील मतदार सुज्ञ असून ते वास्तव परिस्थिती ओळखून योग्य निर्णय घेतील, असा विश्वासही व्यक्त केला.
“सत्य जनतेसमोर येणे महत्त्वाचे आहे. विकासकामांचे राजकारण न करता गावाच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे,” असेही प्रवीण इंगळे यांनी सांगितले.
