कन्नड | प्रतिनिधी :
चालू हंगामात अद्रक (आले) उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत आल्याला मिळालेल्या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून हा काळ उत्पादकांसाठी खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ ठरत आहे.
सध्या बाजारात उच्च दर्जाच्या ‘फर राज’ आल्याला प्रति क्विंटल तब्बल १२,००० ते १३,००० रुपये इतका ऐतिहासिक भाव मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतीमालाच्या दरातील चढ-उतारामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. मात्र आल्याच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे.
दरवाढीमागील कारणे
- यावर्षी विविध कारणांमुळे बाजारपेठेत आल्याची आवक मर्यादित राहिली आहे.
- मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने बाजारभावात मोठी वाढ झाली आहे.
- स्थानिक बाजारपेठेसह परराज्यांतून आणि प्रक्रिया उद्योगांकडून दर्जेदार आल्याला मोठी मागणी वाढली आहे.
या वाढीव दरामुळे शेतकऱ्यांचा लागवड, मशागत व उत्पादन खर्च भरून निघत असून चांगला नफा हाती येत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, बाजारातील ही तेजी काही काळ कायम राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी साठवणूक व विक्रीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.



