मुक्ताईनगर प्रतिनिधी :
मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौक, डेपो समोरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रस्त्यावरील खड्डे आणि साचणाऱ्या पाण्याच्या समस्येकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये चिखल आणि पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनधारक, पादचारी आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने पालकांमध्येही संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना या समस्येबाबत माहिती देण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. रस्त्यावरील पाणी आणि खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
“शाळकरी विद्यार्थ्यांना हा त्रास अजून किती दिवस सहन करावा लागणार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तात्काळ पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.



