मुक्ताईनगर :
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गावातील रस्ते, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
गावाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळकरी मुलांच्या बसही या पाण्यातून धोकादायक मार्गाने जात असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाचा सर्वाधिक फटका गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याला बसला आहे. दवाखान्याच्या आवारात तसेच इमारतीत पाणी शिरल्याने जनावरांसाठी ठेवण्यात आलेली औषधे पाण्यात तरंगताना दिसून आली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
स्थानिक ग्रामस्थ गोविंद म्हसाने यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सांगितले की, “मुसळधार पावसामुळे गावातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने पाण्याचा निचरा करून स्वच्छता मोहीम राबवावी.”
ग्रामस्थांच्या मते, वेळेत उपाययोजना न झाल्यास साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती, पाण्याचा निचरा आणि आरोग्यविषयक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.



