प्रतिनिधी :
मुंबई : राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, इटरीज तसेच अन्न प्रक्रिया करणाऱ्या आस्थापनांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
राज्यात नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत सर्व खाद्य व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नोंदणी करून नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंढे यांनी सांगितले की, ग्राहकांना पिण्यायोग्य व सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. हॉटेल्सनी यासंदर्भातील स्पष्ट सूचना फलक दर्शनी भागात लावावेत. ग्राहकांनी विशेष मागणी केल्यासच बाटलीबंद पाणी द्यावे. अन्यथा ग्राहकांसमोर थेट पाण्याच्या बाटल्या ठेवण्याची सक्ती करता येणार नाही.
तसेच ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी, द्रव साबण, टॉवेल आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अन्न व औषध प्रशासनाने अलीकडे घेतलेल्या तपासण्यांमध्ये अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्याचेही मुंढे यांनी सांगितले. अस्वच्छ वातावरणात अन्न तयार करणे, वारंवार वापरलेल्या तेलात पदार्थ बनवणे, निकृष्ट दर्जाचे पॅकेजिंग आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन अशा प्रकारांवर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.
याशिवाय शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कठोर नियमांची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनातही तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची चर्चा रंगली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी काही ड्रग माफियांनी मोठी रक्कम जमा केल्याचा आरोप केला. मात्र, याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया मुंढे यांनी दिली.
