प्रतिनिधी :
कुरुंदवाड : इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस जुने दानवाड येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असून, या योजनेविरोधात विशेष ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला.
जुने दानवाड येथील कृष्णा-दुधगंगा नद्यांच्या संगमावरून इचलकरंजी शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबवण्याचे नियोजन शासकीय स्तरावर सुरू आहे. मात्र, परिसरातील नागरिकांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने या योजनेमुळे स्थानिक भागाचा मोठा तोटा होईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार आयोजित विशेष ग्रामसभेत ग्रामसेवक सौ. सारिका मोटे, सरपंच राजश्री तासगावे, पोलीस पाटील स्वाती कुन्नरे तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नितीन बागे, वर्धमान तिप्पन्नावर, शिवराज तासगावे आणि खंडेराव चव्हाण यांनी सभेला मार्गदर्शन करत आपली मते मांडली. ग्रामस्थांनी सांगितले की, राजापूर बंधाऱ्याजवळ महाराष्ट्राच्या पाण्याची हद्द संपते. उन्हाळ्यात दुधगंगा नदी कोरडी पडते, तर परिसराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले की, काळमवाडी धरणासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी दिल्या, त्याग सहन केला; मात्र आजही गावाला पुरेसे पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत इचलकरंजी शहरासाठी पाणी देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, पूर्वीही इचलकरंजी शहराला कुरुंदवाडमार्गे पाणीपुरवठा करण्यात आला होता. पुन्हा शिरोळ तालुक्यातून पाणी घेण्याचा प्रयत्न अन्यायकारक असल्याचा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
इचलकरंजी शहरातून पंचगंगा नदीत सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्याला अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत असल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले. “आमच्या हक्काचे पाणी कोणालाही देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेत ग्रामसभेत राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेस विरोधाचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.
यावेळी कुमार पाटील, बाळगोंड पाटील गुरुजी, सुरेश शिदनाळे, आप्पासो वडगावे, नितीन पाटील, सुरज वडगावे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
