जळकोट | प्रतिनिधी
जळकोट येथे राज्य परिवहन महामंडळाचे बस आगार मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी सर्व व्यापारी, शिक्षक, तरुण विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आता गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे.
जळकोट येथे स्वतंत्र बस आगार उभारण्यात यावे, ही नागरिकांची जुनी आणि महत्त्वाची मागणी असून यासंदर्भात विविध स्तरावर निवेदने देण्यात आली आहेत. या मागणीसाठी यापूर्वी अन्नत्याग आंदोलनही करण्यात आले होते. आंदोलनावेळी पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, माजी राज्यमंत्री आमदार बनसोडे साहेब तसेच जिल्हा परिषद सदस्य धर्मपाल देशशेट्टे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन जळकोट बस आगाराचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडेही विशेष पाठपुरावा करण्यात आला आहे.
या पाठपुराव्याची दखल घेत राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथील महाव्यवस्थापकांनी संबंधित अहवाल मागविला आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाने आवश्यक अहवाल सादर करण्याच्या सूचना देत तो छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक कार्यालयामार्फत लातूर विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जळकोट परिसरातील नागरिकांना बससेवेच्या दृष्टीने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून स्वतंत्र बस आगार मंजूर झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
